Saturday 10 March 2018

माझे ट्रेकानूभव...साल्हेरचा थरार...

दिवाळीच्या दिवसात घराची साफसफाई करायची म्हणून तुम्ही कधी माळावर शिताफीने चढून गेला असाल परंतु खाली उतरतांना पाय नेमका कुठे ठेवावा आणि हाताची पकड कुठे घ्यावी असा विचार करत तुमचे कधी उतरायचे वांधे झाले आहेत काय. तुम्ही हा प्रकार अनुभवला असेल तर असे उतरायचे वांधे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि चढाईला अतिशय दुर्गम अशा गडावरून झालेत तर...
दिनांक 13 आॅगस्ट 2017 च्या एका मंद पावसाळ्यातील सकाळी ट्रेकला निघण्याचा आमचा बेत झाला. मी, कैलास सुर्यवंशी उर्फ, उमेश काळे उर्फ मिस्टर काळे, गिरीश , हेमंत उर्फ, दुष्यतभाऊ पोतदार उर्फ दुपो अशी आमची सहा मित्रांची टिम साल्हेर च्या ट्रेकला निघाली. माझ्याव्यतिरीक्त बहूतेकांचा हा पहिलाच ट्रेक होता आणि तो ही सरळ 1567 मिटर्स उंचीच्या महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या शिखरावर. हे म्हणजे पहिलितल्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ दहावीच्या परीक्षेत बसविण्यासारखे होते. मात्र माझा असा अनुभव आहे की पहिलिचा विद्यार्थी देखिल दहावीची परीक्षा देउ शकतो आणि पास देखील होऊ शकतो उट फक्त एकच विद्यार्थ्यांला हे माहीत असायला नको कि आपण देत असलेली परिक्षा पहीलिची नसुन दहांविची आहे.(अर्थात हे मी ट्रेकिंग संदर्भात बोलतो आहे गैरसमज नसावा) . माझ्या सोबतितल्या मित्रांना मी हे सांगितले नाही कारण माझ्याही ट्रेकची सुरवात काहीशी अशीच झाली होती आणि पहिल्याच अनुभवातून मला बराच आत्मविश्वास मिळाला होता म्हणून हा संस्पेस बाकी काही नाही. यापूर्वी 2013 सालच्या जानेवारी महिन्यात मी आणि सुजीतने हा ट्रेक केला होता. नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण तालुक्यातील नदीच्या किनारी वसलेल्या ताहराबाद या सुंदर गावात सुजित च्या मामाकडे मुक्काम करून साल्हेर आणि मुल्हेर या दोन गडांवर चढाई केली होती. साल्हेरची भंव्यता तेव्हा पहिल्यांदा जाणवली परंतु भर पावसाळ्यात धुक्यात दडलेल्या आणि हीरवळीने नटलेला साल्हेर पहाण्याची इच्छा मनात होती. जी आज पुर्ण होणार होती.
सकाळी 9.00 च्या सुमारास आम्ही पिपळनेरला पोहचलो तिथे भरपेट नाश्ता करून आणि सोबतीला खाण्यासाठी काही सामान आणि पाणी घेऊन आम्ही साल्हेरची वाट धरली. ताहराबाद सोडले तसे काही अंतरावरच हरणाबारी धरण लागले. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सिमा भागातून आमचा प्रवास सुरू होतो. सपाट मैदान सोडून आता डोगराळ भाग सुरु झाला. रसत्यालगतची गांव दिसेनाशी झालीत आणि डोगराळ भागात वसलेले लहान लहान आदिवासी पाडे दिसू लागलेत. ढग चांगलेच दाटून आले होते आणि पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सकाळी दहा च्या सुमारास आमची गाडी साल्हेरवाडी या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाला येऊन पोहचली. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता.
पाऊस खरा अनुभवावा तर तो पहाडातच. चहोदुर पसरलेली हिरवळ, झोबनारे गार वारे, डोंगर उतारावरून वाहनारे पाण्याचे ओढे, मधेच भाताची शेत, लपाछपी खेळणार धुक , धिरोद्दत्त विरपुरूषाप्रमाणे अढळ सह्याद्री सारखा अव्हान करणारा, त्याच्या छातिवरून वर वर वाहणारे आणि तुषार बनुन कोसळणारे ढग. पावसाची सार अवर्णनीय सैदर्य दिसत ते पहाडातच आणि अशातच कुठेही जराही आडोसा नसताना मधोमध पावसान आपल्याला गाठलेल. अस गाठल जाण हे कोचावर पडून टिव्हीतला पाऊस पाहणार्याच्या नशिबी नसतच त्यासाठी खिश्यातला मोबाईल आणि पाकीट यांची चितां सोडून तेवढ्याच जिवंतपणे पाऊस अंगावर घेण्याचा दिलदारपणा अंगी असावा लागतो. जो थोडासा सोबत घेऊन आम्ही आजच्या ट्रेकची सुरवात केली.
सकाळी सव्वादहाला जरुरी सामान पाठिवरल्या सॅकमध्ये टाकून चढाई सुरू झाली. सोबतीला सुंदर हिरवळ होतीच. चालण्यापुरती पायवाट सोडली तर सगळा परिसर हिरवळीने नटला होता. थोड्याच वेळात आम्ही हिरवळीने नटलेल्या माळरानावर येऊन पोहचलो. पावसाने जराशी उसंत घेतली तशी गुडगाभर वाढलेल्या गवतात फोटोसेशन सुरू झाले. पाचच मिनिटात पावसाने पुन्हा जोर धरला आणि आम्ही पुन्हा पुढची वाट धरली. चढाईला अर्धा तास झाला तसे सुरवातीला जोशात असे असलेले मावळे आता थकू लागलेत. मधेच आपण किती वर चढून आलो हे मागे वळून पहात, एकमेकांची मस्करी करत आम्ही वर चढू लागलो. ठराविक अंतरावर आमची पायवाट काटकोनात वळली आणि दगडी तुटक्या पायर्‍यावरून आम्ही चालू लागलो...
पहीलाच ट्रेक असल्याने काही आता वैतागून विचारू लागलेत 'भाऊ अजुन कीती राहील' आणि मी दिलासा देत म्हनून लागलो 'थोडच रे अगदी थोड'. मजल दरमजल करीत आम्ही पहिल्या प्रवेशदाराशी पोहचलो. संपूर्ण दगडी बाधनीत असलेला तो रेखीव दरवाजा अजून अभेद्य वाटत होता. तिथेच थोडे पाणी पिऊन पुढची वाट धरली. आता रस्ता तसा कमी चढाचा होता. दोनही बाजूंनी दाट झाडी आणि गवत वाढलेल होत. आमच्या खेरीज तिथे दूरपर्यंत इतर कुणीही दिसत नव्हत. हिरवळीतूनच अतिशय अरुंद पायवाटेने आमचा प्रवास चालला होता तस थोड्याच वेळात पुन्हा तिव्र चढ सुरू झाला. आता खडकात तिन चार फूट उंचीच्या ठिकाणी थोडच पाऊल मावेल अशा कपारीतून वर चढायचे. चढ तिव्र होता, हातची किंवा पायाची पकड बसेल अशा कपारी कमी होत्या आणि त्यात पावसामुळे वाट निसटता होती. आमची खरी परिक्षा येथून पुढे सुरू होणार होती.
मन घट्ट करून आम्ही चढायला सुरुवात केली अंगाने सडपातळ असलेले दोघे तिघे वेगाने चढत होते परंतु वजनदार मंडळची दमछाक होत होती. काही ठिकाणी तर त्यांना वरून ओढावे लागत होते किंवा खालून ढकलावे लागत होते. खरे तर ट्रेक म्हणजे पैसे घालवून जिवाचे हाल करणे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा आजचा ट्रेक होता परंतु हाच थरार तर प्रत्येक ट्रेकरला हवा असतो. ज्याची झिंग 'कुछ और बात है'.
शेवटी त्या कठीण चढावरून आम्ही वर आलोत आणि पुन्हा एकदा आमची वाट 360 अंशाने वळली. आता वाटेत पुन्हा मागे सुटलेल्या पायर्‍या सुरू झाल्यात. एका धोकादायक तिव्र वळनावर आम्ही उभे होतो वर जाणार्या पायर्‍या आमच्या समोर होत्या परंतु चार पाचशे वर्षापुर्वी बांधून ठेवलेल्या या पायर्‍या तिव्र चढाच्या आणि पाउल कसतरी मावेल एवढ्या रूदिच्या होत्या शिवाय बर्याच ठिकाणी त्यांची पडझड झाली होती. आम्ही दोन्ही हात आणि पाय वापरून चढू लागलो. पयरींंचा एक टप्पा संपला की लागलीच दुसरा सुरू व्हायचा आणि प्रत्येक टंंप्याच्या शेवटी मोठा दरवाजा असायचा असे सात दरवाजे आम्ही ओलांडून आता मुख्य गडाच्या माळरानावर येऊन पोहोचलो. थोडे अंतर चालून गेलो तसे दगडात बांधलेल गुहेसारख बांधकाम लागल. समोरच दगडी बांधकाम केलेल पाण्याच तळ होत. जे पाण्याने काठोकाठ भरलेल होत. काठावर एक भग्न मंदिर दिसले. आतली दगडी मुर्ती बहूतेक गणपतीची असावी. तीथे थोडावेळ विश्रांती घेतली. आमच्या आधीचे मुंबईहून आलेले काही ट्रेकस तिथे भेटले जे या पावसाळी दिवसात त्या दुर्गम गडावर रात्रभर मुक्कामाला होते.(खतरू ना एकदम) त्या ट्रेकर्स सोबत काही औपचारिक बोलने झाले.
तुम्ही गूगलवर साल्हेर किल्ला शोधला तर तुम्हाला एका उंच्च शिखरावर एक मंदिर दिसेल. हे मंदिर मुख्य किंल्यावर सर्वात वरिल टेकडीवर आहे आता इथली चढाई सुरू झाली. आकाश निरभ्र असेल तर इथुन दिसणारा नजारा डोळ्यांची पारण फेडतो परंतु आम्ही वर पोहचलो तेव्हा धुक प्रचंड दाटल होत, मोठ्या मुश्किलीने विस फुटावरच पाहता येत होत. शिखरावर कुठलाही आडोसा नव्हता आणि त्या उच्चींवरून प्रचंड वेगाने थंड वारा वाहत होता शिवाय सोबतीला पाऊस होताच. एवढ्या मेहनतीने आम्ही इतक्या वरपर्यंत आलो होतो परंतु इथे थांबने महाकठीण होते. मागच्या वेळी मी इथुन मनसोक्त नजारा अनुभवला होता, मंदिराच्या ओट्यावर पडून निरभ्र आकाश अनुभवल होत, मनसोक्त फोटो घेतले होते परंतु या वेळी आम्हाला 15 मिनिटातच परतीची वाट धरावी लागली. सह्याद्री हा प्रत्येक ऋंतूत वेगळा भासतो याची प्रचिती आली.
त्या उंचीवरून थोडे खाली आलोत तसा हवेचा जोर कमी झाला.आम्ही एका खडकावर थोडावेळ आराम केला. साधारणपणे साडेतीन तासाच्या चढाई नंतर आम्ही वर पोहचलो होतो आता अजून उतरायचे बाकी होते. ज्या वाटेवरून वर आलो तिथूनच उतरायला कुणीच तयार नव्हते. गडावरून उतरायला अजून एक वाट होती. परंतु ती वाट आम्ही जिथून चढायला सुरुवात केली तिथपासून सहा किलोमीटर लांब उतरत होती. शिवाय ती वाट माझ्या ओळखीची नव्हती आणि दाट धुक्यात काहीही स्पष्ट दिसत नव्हते तेव्हा वाट हरविन्याची भिती देखिल होती. शेवटी नाईलाजानेच आम्ही आलो त्याच वाटेने उतरायला सुरुवात केली.
पहीला टंप्पा आम्ही जेमतेम ओलांडला. थंडीने आम्ही थरथरत होतो आणि अतिश्रमाने आता पाय लटपटत होते. जसेही आम्ही पायर्‍यांजवळ येऊन पोहोचलो तसे आमचे लाईट लागलेत. पावसामुळे त्या पायर्‍यांचा अक्षरशः धबधबा झाला होता. येथुन आपण वर चढलो या गोष्टीवर आमचाच विश्वास बसत नव्हता शेवटी कसेतरी सावकाश आम्ही एक एक पायरी सावधपणे उतरून खाली आलो. सर्वाच जाम टरकले होते आणि मला शिव्या घालत होते. मलाही पावसाळ्यात गड एवढे उग्र रूप धारण करेल याचा अंदाज नव्हता. हा खेळ आमच्या अंगाशी आला होता. पावसामुळे वाट निसरडी झाली होती आणि आम्ही सारखे घसरत होतो. मीही घाबरलो होतो परंतु थट्टामस्करी करत बाहेरून जाणवू देत नव्हतो. थांबत बसत कसेतरी आम्ही उतरू लागलो. शेवटी शेवटी तर पायात कळा येऊ लागल्या होत्या आणि थोडीही चालणे असाह्य होत होते. अखेर संध्याकाळी पाचच्या पाचच्या सुमारास आम्ही सुखरूप खालपर्यंत येऊन पोहोचलो.(भगवंता तुझे लाख लाख आभार) पाऊसही आता थांबला होता. आमच्या संपूर्ण ट्रेकमध्ये आम्ही फक्त एक ते दीड तास विश्रांती घेतली होती बाकीचा वेळ आम्ही चालण्यात घालवला होता.सगळेच जाम थकले होते. परंतु म्हनतातना 'अंत भला तो सब भला' कारण शिखर साध्य करण्याचा आनंद सगळ्याच्या चेहर्‍यावर होताच. वाटेतून कुणीही परतल नव्हत.
गडाच्या पायथ्याशी एका हॉटेलात आम्ही चहा घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो. गाडीत गडावर काढलेल्या फोटोंची देवाण घेवाण सुरू झाली. सर्व मस्करीच्या मुड मध्ये होते तसे हळूच एकाने मला विचारले 'विनय आता पुढचा ट्रेक कुठला'. हे एकून मी मनोमन सुखावलो आणि मनातच म्हणालो
.... *चला म्हणजे पोर दहावी पास झालीत*
विनय पाटिल, धुळे

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...