Friday 24 July 2020

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी

चिनी वस्तूंवरील भारताची बंदी ही चीनला योग्य प्रत्युत्तर आहे का की ते आंधळ्या देशभक्ती च्या नादात उचललेल अव्यवहार्य आणि मूर्खपणाच पाऊल आहे...
लेखन : विनय पाटील
या दोघेही गोष्टी लॉजिकल आहेत.
आपली उत्पादने स्वस्त नाहीत म्हणून लोक ती विकत घेत नाहीत म्हणून चीन निर्मित वस्तू संपूर्णपणे टाळणे ओपन मार्केट आणि ग्लोबलायझेशनच्या जगात थोडं कठीण वाटतं सोबतच जपानी लोकांमध्ये असलेली देशभक्ती आणि विजिगीषू वृत्ती आपल्यात यायला हवी ज्यात थोडं महाग असल तरी चालेल परंतु आपल्याच देशातील उद्योगांना आणि माणसांच उत्पादनांच समर्थन करायचे.
परंतु खरं सांगू प्रश्न अतिशय मुळाशी येऊन पोहोचतो तो आपल्या नैतिकतेशी. आज चीन हा भारतापेक्षा सर्वच बाबतीत उजवा आहे (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही सोडून) परंतु मग आपण चीनसारख्या वस्तू का बनवू शकत नाहीत आपल्या इंजिनिअर्सचा सगळ्या जगात बोलबाला असताना आपल्याकडे प्रोडक्शन का कमी आहे. माझ्या ओळखीचे एक उद्योजक आहेत ते म्हणतात चीनमध्ये आपल्याकडील रोजगाराच्या तीन पट रोजगार कामगारांना मिळतो तरीसुद्धा जगातील कंपन्यांना चीनमध्येच उत्पादन केलेल्या वस्तू परवडतात कारण त्यांच्या लोकांची कामगारांची उत्पादन क्षमता प्रचंड आहे सोबतच जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रांसपोर्टेशन च्या सुविधा या सर्वांमुळे भारतीय काय पण अमेरिकेतल्या कितीतरी कंपन्या जसे की एप्पल , ॲमेझॉन ही आपली प्रोडक्स चीन मधून बनवून घेतात तर भारतात ? एक किस्सा सांगतो धुळे शहरा जवळ मागच्या पंधरा वर्षापासून नरडाणा लगत एक एमायडिसी येऊ घातलेली आहे. प्रचंड मोठी जागा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प या योजनेसाठी दिला गेला आहे. पाणी आहे, ट्रांसपोर्टेशन आहे परंतु एमआयडीसीचा काही विकास होत नाहीये. कारण जसे ही कुठली कंपनी मोठी व्हायला लागते तसेच स्थानिक मजूर कामगार लोकप्रतिनिधींना घेऊन जाऊन कधी पगार वाढीसाठी, कधी कामाच्या वेळा कमी करण्यासाठी, तर कधी भूमिपुत्रांनाच नोकरी देण्यासाठी आंदोलन करतात याला कंटाळून कितीतरी कंपन्या बंद पडल्यात किंवा थेट गुजरात मध्ये शिफ्ट झाल्यात आणि खानदेशात बेरोजगार तरुण तसेच राहिलेत याला जबाबदार आपली मानसिकताच नाही काय.हेच थोड्याफार फरकाने संपूर्ण भारतात होते आहे. सोबतच चीन मधून येणारा माल हा प्रचंड कस्टमच्या भ्रष्टाचारा सोबत भारतात येतो यात अधिकार्यांपासून तर स्थानिक दुकानदार पर्यंत सर्व लोक लोणी खातात शिवाय ग्राहकांनाही तो स्वस्तात मिळतो पण पैसा बुडतो तो देशाचा म्हणजे आपल्याच सगळ्यांचा हे आपल्याला कधी कळेल.
म्हणून सगळ्यात आधी राष्ट्रवाद वाढायला हवा
आपल्या भाषेपासून तर अस्मिते पर्यंत आणि नैतिक ते पासून तर व्यापार कौशल्या पर्यंतच शिक्षण शाळांमधून दिलं जायला हवं तेव्हा येणारी पिढी ही राष्ट्रवादाने आणि नैतिकतेने भरलेली असेल आणि भारत सामर्थ्यवान बनू शकेल. आज आपण चीन विरोधी देशभक्तीच्या पोस्ट टिक टॉक च्या चिनी एप'मधूनच पाहतो. तर काही ठिकाणी बँन चाईना झेंडे देखील मेड इन चायना असतात.
प्रत्येक भारतीयाला काही गोष्टी कंपल्सरी केल्याशिवाय सोडवत नाहीत हो. सॉक्रेटिस म्हणतो कधीकधी थोड्याप्रमाणातील हुकूमशाही ही लोकशाहीच्या ओव्हरडोस पेक्षा बरी असते . नाही मग लोकशाहीला सुखावलेले आणि गरिबांचा खरोखर कळवळा असलेले सरकार कसं बेजबाबदार आहे याचा सूर आवळतीलच. शिवाय प्रत्येक जातीचे धर्माचे वेगवेगळ्या नेते वेगवेगळी मते मांडतील खास आपल्या लोकांच्या फायद्यासाठी. परंतु माणसाला म्हणा की राष्ट्राला म्हणा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी , स्वाभिमानाने जगण्यासाठी, आपल्यावरील अन्याय सहन न करण्यासाठी, सुदृढ , ताकदवर असणं गरजेचं असतं आणि सुदृढतेसाठी शिस्त गरजेची असते जी प्रसंगी कठीण निर्णय घेऊनच बाणवावी लागते. सगळ्यात महत्वाचा म्हणजे
देशाने काय करावे यापेक्षा मी काय करतो आहे. नैतिकतेने जगतो आहे, कर प्रामाणिकपणे भरतो आहे, सार्वजनिक स्वच्छता बाळगतो आहे, देशासाठी मरणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी काही दानधर्म करतो आहे, की फक्त व्हाट्अप फॉरवर्ड आणि फेसबुक पोस्ट वाचतो आहे आणि पुढे पाठवतो आहे ही गोष्ट जास्त महत्त्वाची...
कारण इंग्रजीत म्हण आहे
When you are not a part of solution then you are part of problem...
विनय पाटील... मुक्तछंद

Wednesday 29 April 2020

लाजवाब इरफान



*लाजवाब इरफान*

_लेखक : विनय पाटील_

1994 -95 या काळात चंद्रकांता नावाची एक सिरीयल दूरदर्शन वर यायची. तिचा टुकार रिमेक काही वर्षांपूर्वी स्टार प्लस की सोनी कशावर तरी येऊन गेला या मूळच्या चंद्रकांता चा फार मोठा प्रभाव त्यावेळी आम्हा प्रार्थमिक शाळकरी मुलांवर होता. त्या सिरियल चे टायटल सॉंग , त्यात यक्कु म्हणणारा खलनायक इत्यादी आमच्यात फार लोकप्रिय होते पण या सर्वां सोबतच या मालिकेतल बद्रीनाथ नावाचं एक पात्र माझ्यासकट कितीतरी जणांच्या आज देखील लक्षात आहे. क्रिस गेल ठेवतो तसे लांब कुरळे केस काळा पोशाख असे त्याच स्वरूप असायचं. परंतु अभिनय कशाशी खातात हे न कळणाऱ्या त्या वयातही बद्रीनाथ चे जबरदस्त टप्पोरे डोळे टीव्हीच्या स्क्रीनमधून बाहेर येऊन आपल्याशी काही बोलत आहेत असे वाटायचे‌. पुढे ती सिरीयल बंद झाली आणि बद्रीनाथ देखील बरीच वर्ष दिसला नाही.
      २००६-०७ या वर्षी कॉलेजला असताना सहजच मुंबईला जाणं झालं होतं . तेव्हा मुंबईच्या मेट्रो सिनेमात नेमका लाईफ इन मेट्रो हा चित्रपट पाहण्यात आला आणि पाहतो तर काय 'बद्रीनाथ'. मी त्याला पाहताच सिनेमागृहात आनंदाने मित्राकडे पाहून ओरडलो अरे चंद्रकांता मधला बद्रीनाथ. अभिनेता आपल्या अभिनयातून जनमानसावर किती खोलवर छाप सोडत असतो याचे हे बोलके उदाहरण. मित्रांनो असा हा तब्बल दहा वर्षांनी सिनेमाच्या पडद्यावर भेटलेला बद्रीनाथ म्हणजे अभिनेता इरफान खान हे इतक्यात तुम्हाला कळलंच असेल. हा बद्रीनाथ म्हणजेच इरफान खान अनेक वेळा अनेक सिनेमातून भेटतच राहिला.
         विशाल भारद्वाज अधिक चांगला संगीतकार आहे की चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक हे ठरवणे तसं कठीण आहे. मोगली चार जंगल जंगल बात चली है पासुन ‌तर हैदर च्या अरिजित च्या आवाजातल्या गुलो मे रंग भरेपर्यंत अनेक जबरदस्त गाणी आणि कितीतरी अस्सल चित्रपट या  कलाकाराने दिलेले आहेत . शेक्सपिअरच्या नाटकांच्या प्रेमात पडलेला हा दिग्दर्शक 2004 झाली मॅकबेथ या शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित मकबुल हा सिनेमा घेऊन आला होता. पियुष मिष्रा, नसरुद्दीन शहा, पंकज कपूर, ओम पुरी ,तब्बू असे तगडे अभिनेते असलेल्या या चित्रपटाचं मुख्य पात्र होतं इरफान खान याच.  या दमदार अभिनेत्यांच्या गर्दीत देखील इरफान फार वेगळा भासतो (टीप कुण्यातरी महानुभावान मकबुल युट्युब वर टाकून ठेवला आहे जरूर बघा) त्यानंतर 2008 मध्ये तो भेटला स्लमडॉग मिलेनियर मधून एका पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात या चित्रपटाचा दिग्दर्शक डॅनी बॉयल म्हणतो  *_He has an instructive way of finding moral centre of any character._* आणि character च moral centre साधण्याची हीच किमया इरफान कधी लाईफ ऑफ पाय मधून तर कधी लंच बॉक्स मधून साकारत आला आहे.
दरम्यान बिल्लू, गुंडे ,आण, तलवार असे कितीतरी पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट देखील त्याने केलेत परंतु साधारणपणे 2000 सालानंतर मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दिकी, केके मेनन ,राजकुमार राव ,पंकज त्रिपाठी ,पियुष मिष्रा अशा अभिनेत्यांनी आणि अनुराग कश्यप ,विशाल भारद्वाज, विक्रमादित्य मोटवानी, झोया अख्तर इम्तियाज अली अशा ताज्या दमाच्या दिग्दर्शकांनी व्यावसायिक आणि प्रायोगिक सिनेमातली भिंत उध्वस्त करण्याचे काम केलेले दिसते. जी भिंत 2000 साला पूर्वी फार ठळक आणि उंच भासायची आणि या या सर्व कलाकारात  इरफान खान हा थेट सलाम बॉम्बे पासून तर अंग्रेजी मिडीयम पर्यंत महत्वाचा शिलेदार राहिलेला आहे.
इरफान खान म्हणजे विलक्षण बोलके डोळे *_actor who talk with his eyes_* असं त्याच्याबद्दल कौतुकाने म्हटले जाते. आणि या  डोळ्यांच्या सोबतीला असतो तोंडातल्या तोंडात बरळल्यासारखी परंतु अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी संवादफेक, भाषेतल्या वेगळ्या लकबी . ही भाषेतली लकब उचलताना अभिनेता मुळात याच मातीत जन्माला आला असावा असा समज होण्याची शक्यता दाट असते. बहुतेक इरफानच एनएसडी कनेक्शन याला कारणीभूत असाव.
हल्लीच्या काळात त्याने हिंदी मिडीयम सारख्या चित्रपटातून जो सहजसुंदर अभिनय साकारला त्याने माझ्यासारखे कितीतरी लोक भारावून गेलेत आमच्यासारख्या प्रादेशिक भाषात शिकलेल्या परंतु आपल्या मुलांनी इंग्रजीतच शिकावं असा अट्टाहास बाळगणार्‍या पालकांच्या व्यक्तिमत्वातील विरोधाभास त्याने ज्या सहजतेने पकडला तो केवळ शब्दातीत आहे. इंग्रजी न येण्याचा न्यूनगंड आपल्या एकंदर अभिनयातून तो ज्या जिवंतपणे माडतो त्यातून या न्यूनगंडाच्या प्रेमात पडायला होतं. इरफान अतिशय सहजपणे आपली नाळ प्रेक्षकांची जोडतो , सर्वसामान्यांना तो आपल्यातलाच कुणीतरी वाटतो म्हणून वोडाफोन सारखी कंपनी इरफान खान आणि त्याची संवादफेक या भांडवलावर जाहिरात करते आणि कोट्यावधींचा धंदा करते.
        तिग्मांशू धुलिया (गँग्ज ऑफ वासेपूर मधला रामाधीर सिंग) याने 2003 साली हासिल या चित्रपटातून इरफानला संधी दिली होती. आशुतोष राणा आणि इरफान खान यांच्यातील अभिनयातली जुगलबंदी आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी राजकारण यावर बेतलेला हा सिनेमा अगदी अफलातून आहे. याच तिग्मांशु धुलियाने इरफान सोबत नंतर चरस आणि साहेब बीवी और गैंगस्टर सारखे बरेच सिनेमे केलेत परंतु 2012 सालि आलेला आणि इरफान च्या अभिनयाने सजलेला पानसिंग तोमर या चित्रपटाने इरफानला त्याच्या कारकिर्दीतले शिखर गाठुन दिले. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे .असे चित्रपट जर ऑस्करच्या नॉमिनेशन मध्ये असतील तर नक्कीच भारतातला ऑस्कर पुरस्कारांचा दुष्काळ संपू शकेल. कथानका पासून तर दिग्दर्शना पर्यंत आणि एडिटिंग पासून अभिनया पर्यंत सर्व काही या चित्रपटात अतिशय उच्च पातळीच आहे. या चित्रपटातला इरफानचा अभिनय म्हणजे रोलर कॉस्टर राईड आहे. सुदैवाने 2012 साली अलिगड मधील मनोज वाजपेयी च्या भूमिकेला टाळून तद्दन व्यावसायिक असलेल्या रुस्तम सिनेमातील अक्षय कुमारला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देणारी बुद्धिमान कलासक्त माणसे राष्ट्रीय पुरस्कार समितीवर नव्हती म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार इरफान च्या पदरात पडला. या चित्रपटातील चंबळ खोऱ्यातील हिंदीचा जो बाज इरफानने पकडला आहे तो ऐकावाच लागेल. बाकी शब्दात ती गोष्ट मांडणे मला शक्य वाटतं नाही. एवढेच कशाला हैदर मधला सुरुवातीच्या काही क्षणांसाठी येणाऱा आणि मोजून काही संवाद बोलून जाणाऱा इरफान चित्रपट संपेपर्यंत पाठ सोडत नाही.
     इरफानने हॉलिवूड मध्ये देखील एसीड फॅक्टरी , अमेजिंग स्पायडरमॅन असे बरेच सिनेमे केलेत . त्याचा हॉलीवूडचा आमिर खान म्हणजेच टॉम हँक्स सोबतचा इन्फर्नो देखील पाहण्याजोगा आहे . कदाचित आपण आज पसरलेल्या कोरोना विषाणूचीच गोष्ट चित्रपटातून पाहत आहोत अस आपल्याला वाटेल.
1993 यावर्षी स्टीव्हन स्पीलबर्गचा जुरासिक पार्क बघण्यासाठी आपल्या मित्राकडून उधार पैसे घेऊन गेलेला इरफान 2015 यावर्षी प्रदर्शित झालेल्या जुरासिक वर्ल्ड या चित्रपटात जुरासिक वर्ल्ड चा मालक आहे याला काय म्हणावं दैवी देणगी, प्रचंड परिश्रम की स्वतःवरील विश्वास.
क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की तुम्ही बॅट्समन प्रॅक्टिस करून बनू शकतात परंतु फास्ट बॉलर बनण्यासाठी तुम्हाला जन्मच घ्यावा लागतो. तसंच काहीसं कलेच्या बाबतीत असाव असं मला वाटतं. म्हणून कदाचित मेगास्टार च्या घरात जन्माला येऊन देखील आणि पंचवीस-तीस सिनेमे करून देखील एखादा अभिषेक बच्चन बनून राहतो आणि गावा खेड्यात जन्मलेले , वेटर, शिपाई बनून,  मजूरी करून जगलेली माणसं नवाजुद्दीन सिद्दिकी, मनोज वाजपेयी किंवा पंकज त्रिपाठी बनतात. इरफान ही असाच विना गॉड फादर चा जन्माला आला आणि अभिनयातला फादर म्हणावा अशी कारकीर्द गाजवून गेला. सध्या कोरोणा विषाणूच्या बातम्यांमुळे, दहशतीमुळे एक प्रकारची नकारात्मकता वातावरणात भरून राहिलेली आहे. त्यातून बाहेर पडण्याची पराकाष्टा होत असतानाच इरफान सारख्या अस्सल कलावंताच आणि जातिवंत अभिनेत्याचं जाण हे रात्रीचा काळोख गहिरा करणार आहे. इरफानच जाणं अगदी स्मिता पाटील, गुरुदत्त, संजीव कपूर यांच्या जाण्यासारखा आहे. त्यांच्या अवेळी जाण्याच्या जखमा आजही कितीतरी रसिकांच्या मनातून भळभळत आहेत. परंतु कलाकार असण्याच एक सौंदर्यही आहे . कलाकार हा आपल्या कलेतून नेहमीच जिवंत असतो आणि इरफान सारखा अस्सल अभिनेता मृत्यूपूर्वी कितीतरी आयुष्य जगून गेला आहे.
माझ्यातला शहाणा माणूस हे मान्य करतो आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकालाच जायचं असतं तसंच इरफान गेला परंतु माझ्यातला लहान मुलगा हे मान्य करायला तयार होत नाहीये की चंद्रकांता मधल्या बद्रीनाथ कधी मरू शकतो
*इरफान तुला सलाम आहे..*

आपण लेखकाचे इतर लेखन खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकतात...

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...