Monday 7 February 2022

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है...

विनय पाटील


स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गीते


कवी ग्रेस यांच्या या ओळी लतादीदींच्या स्वरात ऐकल्या होत्या आज लता दीदीं साठीच या ओळी गाव्या लागत आहे ही मोठी शोकांतिका आहे.

 माणसं गेल्यानंतर आपल्या गुणदोषांसकट अनेकदा महान म्हंटली जातात. काही सामाजिक आणि राजकीय गरजापोटी  बऱ्याचदा काही व्यक्तीवर महानता लादली जाते परंतु आपल्या जिवंतपणी अख्यायिका बनण्याचे भाग्य थोड्या लोकाना लाभतं. अशीच एक व्यक्ती काल अनंतात विलीन झाली आणि सबंध देशाला वाटलं की आपल्याच घरातील कुणालातरी आपणं परके झालो.

  नव्वदीच्या दशकात माझ्यासारख्याच शाळेत जाणाऱ्या पिढीला हे आठवत असेल की आमची सुरुवात ही सकाळी रेडिओ वर लता दीदींच्या  आवाजाने व्हायची. कधी पसायदान तर कधी जयोस्तुते कधी गजानना श्री गणराया तर कधी गगन सदन तेजोमय असं उत्तम, उदात्त आणि उन्नत शब्द स्वर आणि संगीत ऐकण्याचा तो काळ होता.  लता मंगेशकर आणि त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्यामुळेच संत ज्ञानेश्वरांचे पसायदान कबिराचे दोहे, मीराबाईची भजन आणि सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत कविता आमच्या पिढीने अनुभवल्या.

 हे दीदींचे आणि हृदयनाथ यांचे फार मोठे उपकार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या या पिढीवर आहेत. नव्वदीच्या दशकात रेडिओवर जुनी सदाबहार गीत कानी पडतच असायची सोबतीला टीव्हीवर आणि टेपरेकॉर्डर वर कधी मैने प्यार किया तर कधी हम आपके है कौन , दिल तो पागल है यांसारख्या चित्रपट गीतांमधून दीदी चे स्वर भेटत राहायचे. परंतु यारा सिली सिली आणि जिया जले ही गीत जेव्हा मी ऐकलीत तेव्हा एखाद्या गीताने वेड लागण काय असतं हे प्रत्यक्ष अनुभवलं. रुदाली मधील झुटी मुटी रतिया ही असाच काहीसा प्रकार आहे. टेपरेकॉर्डर नंतर सीडी आणि सीडी प्लेयर चा जमाना सुरू  झाला होता. तेव्हा आमचे कॉलेजातील संपूर्ण लिखाण काम हे कधी किशोर कुमार, लता मंगेशकर  तर कधी मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या स्वरांच्या साक्षीने पूर्ण झाले आहे.

  काळाच्या प्रवाहात थोडं मागे गेलं तर कळतं की लता मंगेशकर या गायिकेने गीतांचा किती प्रचंड मोठा खजिना निर्माण करून ठेवला आहे. 

लता दीदी ने गायलेले नेमके कुठले गीत आठवावे असे झाले आहे परंतु काही खास मर्मबंधातील ठेव असलेली गीत म्हणजे  चलते चलते (पाकीजा), सोर्स बरस की , बडा नटखट है रे, आज फिर जीने की तमन्ना, नदिया किनारे, मेरे नैना सावन भादो, तेरे बिना जिंदगी से, अजीब दास्ता हे ये, माईरी मैं कासे कहू, लग जा गले , निंदिया से आई बहार आणि अशी कधीही न संपणारी यादी.

   अनेक महान गायकांना चांगला आवाज लाभला आहे त्यातच बरेच प्रचंड मेहनत करून पट्टीचे गायक बनले आहे. कुणी अतिशय तरण आणि मखमली सूर घेऊन गजलेत साम्राज्य निर्माण करणारा जगजीत झाला तर कुणी माधुर्याने ओतप्रोत रफी बनला कुणी दुःख आणि आनंदाचा जादुगार किशोर झाला तर कुणी चिरंतन वेदनेचा आवाज मुकेश झाला परंतु दिदी वेगळ्या भासतात या सर्वां गुणा सोबतच विधात्याने दीदीच्या स्वरांना एक ईश्वरीय देणगी दिली जी प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीला जाणवत राहते परंतु शब्दात व्यक्त करता येण केवळ अशक्य. दीदींचा आवाज या ऐकणाऱ्याचा सरळ परमेश्वराशी नाळ जोडून द्यावा असा आहे.

  दीदी जन्माने मराठी होत्या म्हणून मराठी माणसाचे भाग्य इतर भारतीय माणसांपेक्षा अधिक उजळलं आणि मेहंदीच्या पानावर सारख्या भावगीतापासून तर सुन्या सुन्या मैफिलीत सारख्या गजले पर्यंत आणि राजसा जवळ जरा बसा सारख्या लावणीपासून तर गजानना श्री गणराया सारख्या भक्ती गीता पर्यंत मराठी गीतांचा खजिना रसिकांना उपलब्ध झाला. मराठी चित्रपटातील दीदींनी गायलेली गीत आणि दीदीचे साधी माणसं या चित्रपटातील संगीत हा लेखाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो.

  माझे आजोबा आयेगा आनेवाला च्या पिढीतील होते वडील कभी कभी ऐकत मोठे झाले मी लहान असताना दूरदर्शन वर मिले सुर मेरा तुम्हारा ऐकत मोठा झालो त्यात दीदी जेव्हा सूर की नदिया हर दिषा से बेहते सागर मे मिले ही ओळ गायच्या तेव्हा अंगावर काटा यायचा. ज्याला आजकाल शुद्ध मराठीत goosebumps म्हणतात.

  दीदी या एका पिढीच्या गायिका नव्हत्या तर एका युगाच्या गायिका होत्या. २०व्या शतकात १९५० ते २००० या पन्नास वर्षाच्या कालखंडात या गायिकेने भारतीय संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. अगदी शास्त्रीय संगीताची जाण असलेला तज्ञ गायक असो की रस्त्यावर भाजीपाला विकणारा सामान्य व्यावसायिक सर्वांनाच एकाच प्रमाणात आवडणं हे सचिन, अमिताभ अब्दुल कलाम आणि लता मंगेशकर अशा काही मोजक्याच नावांना साध्या आहे . भारतीय चालू सामाजिक आणि राजकीय परिस्थिती तसेच कमालीचा वाढता जातीयवाद आणि संकुचितपणा यांच्या पार जाणाऱ्या व्यक्ती फारच थोड्या उरल्या आहेत त्यातील एक व्यक्ती या देशाने काल गमावली.

गेलं शतक हे बुद्धीसाठी अल्बर्ट आईन्स्टाईन अभिनयासाठी चार्ली चापलीन समाजकार्यासाठी महात्मा गांधी आणि संगीतासाठी लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखलं जाईल.

लता मंगेशकर हे परिपूर्णतेचा नाव आहे, हे कलेच्या प्रती असलेल्या सचोटीच नाव आहे, दैवी प्रतिभेच नाव आहे, अफाट कर्तुत्वाच नाव आहे आणि माझ्या सारख्या ( हवं तर अंध म्हणा ) भक्तांसाठी साक्षात माता सरस्वती च नाव आहे. आपल्या जयोस्तुते या काव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते'

सावरकरांना अभिप्रेत असलेली स्वतंत्रते भगवती ही आजच्या काळातील माता सरस्वती लतादीदी आहेत असे मला वाटते. उत्तम, उदात्त आणि महान गोष्टींच्या निर्मितीचा ध्यास दीदींच्या जगण्याचा गाभा होता. एवढं दर्जेदार काम एवढ्या प्रचंड प्रमाणात करणं ‌ यासाठी दैवी देणगीच असायला हवी. माझ्या एका मित्राने मला सांगितलेला किस्सा त्यांच्या विद्यापीठात एकदा एक विदेशी विद्यार्थी भारतीय संस्कृती शिकण्यासाठी आला होता तेव्हा त्याने एकदा प्राध्यापकांना विचारलं

What is essence of Indian culture.

तेव्हा रेडिओ वर लता दीदी ची गाणी ऐकत असलेले प्राध्यापक उत्तरात म्हणाले

Listen carefully, this voice is essence of Indian culture.


खरोखर आनंद, दुःख , प्रेम , विरह सर्वच मानवी भावनांसाठी आणि होळी, दिवाळी, विवाह, अशा भारतीय सन उत्सवांसाठी दीदींनी कितीतरी गीत गाऊन ठेवली आहेत. एक व्यक्ती एका जन्मात किती प्रचंड कार्य करू शकते याचं लता दीदी एक उदाहरण आहे. मी आकाशवाणीवरून निवेदक म्हणून काम करीत असताना लतादीदींची खास कमी लोकप्रिय गाणी श्रोत्यांना ऐकवत आलो आहे. हे सर्व करताना आपण कुठलेतरी पुण्य कर्म करतो आहोत अशीच भावना माझ्या मनात निर्माण होते. कितीतरी दुःखितांचे दुःख दीदींच्या स्वरांनी कमी झालं असेल आपल्या स्वरांच्या मधून त्यांनी करोडो लोकांना सात दशके असीम आनंद दिला आहे. पैशातच काय परंतु कुठलाही पुरस्कार या आनंदाची परतफेड करू शकणार नाही.

ना.धो. महानोर, ग्रेस, गुलजार, सुरेश भट, बा.भ.बोरकर, साहिर लुधियानवी, शैलेंद्र असे सारस्वत कदाचित फक्त शब्दांमधून जेवढे पोहोचू शकले नसते तेवढे ते लता दीदींच्या आवाजातून जनमाणसात खोल उतरले आहेत.

दिदी जग सोडून गेल्याने काय झालं असेल.

जसे की घरात फुलदाणीत ताजी फुलं असली आणि नसली तरी घराला फारसा फरक पडत नाही परंतु त्यांच्या असण्याने घराचं घरपण जिवंत वाटतं अगदी तसं गेल्या काही वर्षांपासून दीदी गात नव्हत्या परंतु त्यांचं या जगात असंन सुद्धा हे जग अधिक सुंदर बनविनार होत. माझ्यासारख्या करोडो संगीत प्रेमी वर आमच्या जन्माच्या आधी लता दीदीं च्या रूपाने सांगीतिक संपत्ती निर्माण करून परमेश्वराने प्रचंड उपकार केले आहेत. आता यानंतर दिदी आपल्यात नाही हे वास्तव स्वीकारून जगणे थोडे कठीण वाटते. गुलजार किनारा या चित्रपटात दीदींच्या आवाजात म्हणतात तसे


वक्त के सितम कम हसी नही

आज है यहा कल कही नही

वक्त से परे अगर फिर मिले कही

मेरी आवाज ही पहचान है

गर याद रहे...


कदाचित दीदी म्हणत आहेत दुसऱ्या जगात मी तुम्हाला नक्की भेटेन फक्त आवाज लक्षात असू द्या...

No comments:

Post a Comment

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...