"कवळ्या नजरेची कवळी कळी पोर
कवळ्या डोळ्यातील कवळी भिरभिर
कवळ्या पिरतीच्या कवळ्या खाणाखुणा
कवळ्या हातावर कवळा कात चुना "
कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या ओळी, लेखक मिलिंद बोकील यांची शाळा हि कादंबरी किंवा श्रीकांत देशमुख लिखित नली हे नाटक या सर्वात मला एक सामान धागा जाणवतो. स्वातंत्र्यानंतर खेडेगावातील घरातून शिक्षण घेणारी हि पहिली पिढी आणि त्या पिढीच्या बालपणातील तसेच बालमानांतील खोलवर कप्यात दडून बसलेल्या, वेणीफणी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकणाऱ्या त्यांच्यासोबतच्या अल्लड पोरी .या मनात दडून बसलेल्या पोरिनीच या पिढीतील काही तरुणांना लिहीत केलं बोलत केलं. ज्यातून मातीतून आलेल्या या माणसांनी मातीतल्या कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्यात आणि तुम्हा अम्हासारख्याना त्या प्रचंड भावल्यात कारण आपण कुठेतरी आपलीच गोष्ट ऐकत असल्याची अनुभूती या साहित्याने आपल्याला दिली. कांहीस असाच भारून टाकणारा अनुभव काल जळगावच्या परिवर्तन या संस्थेंच्या नली या नाटकातून मिळाला तो काहीअंशी तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच.
नली हे एकलनाट्य श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारलेले आहे. मागील अनेक वर्षांपासून जळगाव शहरात परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक परिवर्तनाचा रथ हाकणारे जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांची हि संकल्पना. यांचं सांस्कृतिक परिवर्तनाचे आणि त्यातून होणाऱ्या मंथनाचे थोडेफार तुषार खान्देशातील इतर शहरावर उडताहेत त्याचाच परिपाक म्हणजे धुळे शहरात काल झालेला नली या नाटकाचा प्रयोग. या नाटकाचे दिग्दर्शन योगेश पाटील या नव्या दमाच्या तरुणाने केलेले आहे. मुळातूनच खेड्यतून आलेला हा तरुण या नाटकाच्या माध्यमातून जे इरसाल ग्रामीण रंग या नाटकात भरतो ते वाखाणण्या जोगे आहे. एकलनाट्या हा एकपात्री प्रयोगच असतो यात आपल्या अभिनयातून सर्वच पात्र उभी करण्याची क्षमता आणि प्रतिभा अभिनेत्यात असायला हवी. विविध भूमिकांचं नेमकं अवलोकन, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास, ग्रामीण त्यातही तावडी आणि अहिराणी या भाषांवरची पकड आणि क्षणात बदलणारी व्यक्तिरेखा या साऱ्या गोष्टी आपल्या अभिनयातून जिवंत करणारा अभिनेता म्हणजे हर्षल पाटील. या तरुण अभिनेत्याचा रंगमंचावरचा सहज वावर आणि आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. हे कुठेले नाटक नसून गावात कुठेतरी मारुतीच्या देवळावर, शाळेत, विहिरीच्या वाटेवर रोज घडणारे संवाद आहेत असाच भास होत राहतो. आपल्या विलक्षण बोलक्या डोळ्यांनी हर्षल या दहा ते बारा व्यक्तिरेखा लीलया साकारतो. कधी मनमुराद हसवतो तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणायला भाग पाडतो. हर्षल चा हा अभिनय सहज आहे त्यात कुठलाही अविर्भाव नाही ज्यातून आपण नाटकाच्या अजून जवळ जाऊन पोहचतो.
आपल्यासोबत शाळेत शिकत असलेल्या पोरींचे नेमके काय झाले असेल हा प्रश्न फेसबुक आणि व्हाट्सअँप सारखा सोशल मीडिया नसताना शिकून तरुण झालेल्या संपूर्ण पिढीला सतावत आला आहे .त्यातल्या त्यात मोठ्यघरातल्या किंवा लग्न करून मोठया घरी गेलेल्या काही मुली सुखवस्तू झाल्या असतीलही परंतु शेतात राबणाऱ्या , दिवसभर गुरांमागे फिरणाऱ्या , विहिरीवरून पाणी आणणाऱ्या आणि मधेच शिक्षण सुटलेल्या पोरींची सगळी पिढी काळाच्या कप्यात कुठे गडप झाली आणि आज देखील होते आहे हा अस्वस्थ करणारा प्रश्न काही केल्या पाठ सोडत नाही. एकार्थाने त्यांचं असे नाहीसे होणे हे दुःखद असेल हि परंतु जेव्हा नली हि नाटकातल्या बाळूला आयुष्याच्या प्रेत्येक टप्यावर भेटत राहते तेव्हा शाळेनंतरचे तिचे भेटणेही कुठे आनंददायी असते. शेवटी मातीतल्या या मुलींचे माती होऊन जाणे हि घटना कुठे सुखावणारी आहे. आज शेतकऱ्यांच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात कारण त्यांना शहरात जाण्याची आणि सुखात राहण्याची इच्छा असेलही पण त्या पेक्षाही त्यांना नको असत ते असं झुरत झुरत मातील मिसळून जाणं.
नाटक या कलाप्रकाराचे वगेळेपण म्हणजे हि एक जिवंत कला आहे. नाटकाचा अनुभव हा नाट्यगृहातूनच मिळू शकतो. कितीही ताकदीच्या अभिनेत्यांचा कितीही चांगला अभिनय पडद्यावर दिसत असला तरी प्रत्यक्ष रसिकांच्या समोर उभं राहून नाटक सादर करण्याची सर त्याला येणार नाही आणि बहुतेक म्हणूनच नसरुद्दीन शाह सारख्या अनेक सिनेमातल्या नवलजेलेल्या अभिनेत्यांना नाटक करण्याचा मोह अजून हि सुटत नाही. नाटकासारख्या अलौकिक कलेला हल्ली चांगले दिवस नाहीत. या क्षेत्रातील कलावंतांना स्वतःच्या मेहेनतीने नाटक उभं करावं लागत आणि नंतर काही ठिकाणी ते बघण्यासाठी प्रेक्षक हि शोधावे लागतात. या सर्वामागे आमच्यासाखे उदासीन रसिक जबादार आहेत कि फक्त हसवणूक आणि त्यातून प्रेक्षकांची फसवणूक करणारी नाटके आणि नाट्यसंथा जबाबदार आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु यामुळे आजच्या पिढीचे सांस्कृतिक , बौद्धिक कुपोषण होत आहे हे मात्र नक्की. परिवर्तन सारखी संस्था हि कोंडी फोडू पाहत आहे आणि नली सारखा प्रयॊग हि त्यांनी मारलेली मुसंडी आहे हे माहे प्रामाणिक मत आहे.
हे नाटक ज्या जेष्ठ रंगकर्मी यादव खैरनार याच्या स्मृतिमोह्त्सवाच्या निमित्तानं अनुभवयाला मिळाले त्या यादव दादांचे,सौ रंजना खैरनार ताईचे , खैरनार परिवाराचे, तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे , मानवता बहुउद्देशीय विकास संस्था धुळे, लोकमंगल कलाविष्कार संस्था , मॅड स्टुडिओ ,महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या ,आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या सर्व नाट्यसवेकांचे आणि धुळ्यात खासकरून नाटक रुजविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणाऱ्या संदीप पाचंगे , मुकेश काळे या नाट्यवेड्याचे धुळेकर रसिकांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद .
विनय पाटील, धुळे
Thanks Vinay sir
ReplyDelete